बोदवड तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची रोहिणी खडसे यांनी केली पाहणी

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड तालुक्यात जुलै महिन्यापासुन सतत संततधार पाऊस पडत असल्याने ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेती उत्पादनात प्रचंड घट होऊन जेमतेम उत्पादन होऊ शकेल अशी परिस्थिती असताना गेल्या चार दिवसापासून कोसळलेल्या ढग फुटी सदृश्य मुसळधार पावसाने शेतात काढणीला आलेले मका, सोयाबिन, उडीद, मुग, भुईमूग हे पिके जमीनदोस्त झाले आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मका सोयाबीनची कापणी केली आहे कापणी केलेले मका सोयाबिन वाहून गेले आहे तर शेतात पडून असलेल्या पिकाला कोंब फुटले आहेत.

फुटलेला कापुस खाली लोंबकळला आहे तर कैऱ्या काळवंडून सडत आहेत. मनुर व परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे परंतु या मंडळात पर्जन्यमापक यंत्र बसवलेल्या ठिकाणी कमी पाऊस पडल्याने 65 मिमी पावसाची नोंद न झाल्याने शेतकरी बांधवांना पिक विमा कंपनीकडे क्लेम करताना अडचणी येत आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मनुर आणि परिसरातील गावातील शेत शिवाराला भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीशिवाराची पाहणी केली व बोदवड तहसीलदार यांच्या सोबत भ्रमणध्वनी वरून संवाद साधुन ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करण्या बाबत चर्चा केली.

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या’खरिप हंगामाच्या सुरुवातीला चांगले पर्जन्यमान होऊन शेत शिवारात पिक बहरल्याने शेतकरी बांधवानी खते,कीटकनाशके फवारणी वर लाखो रुपये खर्च केला परंतु सततच्या संततधार पावसामुळे आता ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने त्यातच या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतात काढणीला आलेले मका, सोयाबिन, उडीद मुग, भुईमूग कापसाचे पिक वाया जाऊन शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावाल्याने व आतापर्यंत झालेला खर्च वाया गेल्याने शेतकरी बांधवांपुढे आता जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला असुन शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत तरी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून आचारसंहिता लागण्यापुर्वी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सरसकट हेक्टरी भरीव स्वरूपात आर्थिक नुकसान भरपाई देऊन या संकटात शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकरी बांधवांना धिर द्यावा अशी आपली मागणी असून याबाबत काल शुक्रवारला आपण जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पंचनामे करण्यात वेळ न घालवता ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्या बाबत मागणी केल्याचे सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालूका अध्यक्ष प्रशांत पाटील, रामदास पाटिल, डॉ. ए. एन. काजळे, विलास देवकर, सतिष पाटिल, निलेश पाटील, एकनाथ खेलवाडे, शाम सोनवणे, रविंद्र पाटिल, विनोद कोळी, आनंदा पाटिल, प्रकाश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते

Protected Content