नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील इंधन पुरवठ्याबाबत मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी लवकरच नॅचरल गॅसचे दोन मोठे कार्गो येणार असून त्यामुळे देशातील गॅस पुरवठा पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार कच्च्या तेलाचा पुरवठाही स्थिर असून नागरिकांनी घाबरून गॅस सिलिंडर बुकिंगसाठी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या संघर्षाचा थेट परिणाम जागतिक इंधन पुरवठ्यावर झाला असून अनेक देशांना इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीचा परिणाम भारतावरही झाला असून काही भागांत एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल आणि खाद्य व्यवसायिकांना तात्पुरते दुकान बंद ठेवण्याची वेळ आल्याचे चित्र दिसत होते.

या तणावपूर्ण परिस्थितीत इराणने काही देशांसाठी विशेषतः अमेरिका, तिचे सहयोगी देश आणि काही युरोपीय राष्ट्रांसाठी Strait of Hormuz ही महत्त्वाची सामुद्रधुनी बंद केली आहे. या मार्गाने जगातील मोठ्या प्रमाणात कच्चे तेल वाहतूक केले जाते. युद्ध आणि हल्ल्याच्या भीतीमुळे अनेक तेल कंपन्यांनीही या मार्गाने तेल वाहतूक करण्यास नकार दिल्याने जागतिक स्तरावर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयातील संयुक्त सचिव Sujata Sharma यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतासाठी नॅचरल गॅसचे दोन मोठे कार्गो लवकरच देशात पोहोचणार आहेत. त्यांनी सांगितले की, देशात कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत असून तेल विपणन कंपन्या विविध देशांकडून कच्चे तेल खरेदी करत आहेत. त्यामुळे सध्याच्या जागतिक संकटाचा भारतावर मोठा परिणाम होऊ नये यासाठी पर्यायी पुरवठा मार्ग सक्रिय करण्यात आले आहेत.
यापूर्वी भारतात येणाऱ्या कच्च्या तेलापैकी सुमारे 45 टक्के तेल Strait of Hormuz मार्गे येत होते, तर उर्वरित 55 टक्के इतर मार्गांनी आयात केले जात होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत सरकारने धोरणात्मक बदल करून कच्च्या तेलाच्या आयात मार्गांमध्ये मोठा फेरबदल केला आहे. आता भारतात येणाऱ्या कच्च्या तेलापैकी सुमारे 75 टक्के तेल इतर मार्गांनी आयात केले जात आहे, तर होर्मुज मार्गे येणारे तेल सुमारे 25 टक्क्यांवर आणले आहे.
सरकारने नागरिकांना घाबरून गॅस सिलिंडरचे अतिरिक्त बुकिंग करू नये, असे आवाहन केले आहे. अनावश्यक घाईमुळे वितरण व्यवस्थेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. देशात गॅसचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी वितरण व्यवस्थेवर सरकारकडून विशेष लक्ष ठेवले जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.



