जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर ते पाल या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले असून, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.
रावेर ते पाल दरम्यानचा हा महत्त्वाचा रस्ता सध्या मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापलेला आहे. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची पृष्ठभाग पूर्णतः उखडलेली असल्याने वाहनांचे संतुलन बिघडण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी लहान-मोठ्या अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे नागरिक सांगत आहेत.

रावेर तालुक्याच्या मुख्य ठिकाणी शासकीय कार्यालये तसेच खाजगी कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. विशेषतः विद्यार्थी आणि युवक वर्गाला शिक्षण व नोकरीसाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. मात्र रस्त्याच्या खराब स्थितीमुळे त्यांचा प्रवास अत्यंत कष्टदायक ठरत असून, वेळेचे तसेच आर्थिक नुकसानही होत आहे.
हा मार्ग आदिवासी भागातील नागरिकांना शहराशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या रस्त्याचे महत्त्व अधिक वाढते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून संबंधित विभागाकडून दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची अवस्था अधिकच खालावली आहे. पावसाळा सुरू झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच आमदार अमोल जावळे यांनीही या समस्येकडे लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत सर्वत्र व्यक्त केले जात आहे.



