नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारच्या ४०,००० कोटी रुपयांच्या निधीचा महाविकास आघाडीच्या सरकारकडून गैरवापर होऊ नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांना बहुमत नसतानाही मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. कर्नाटकात शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
अनंत कुमार हेगडे म्हणाले, तुम्हा सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रात आमचा माणूस (फडणवीस) 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाला. त्यानंतर फडणवीसांना राजीनामा दिला. त्यांनी हे सर्व नाटक कशासाठी केले? आमच्याकडे बहुमत नाही हे आम्हाला माहित नव्हते का? तरीही ते मुख्यमंत्री का झाले? हा तोच प्रश्न आहे जो सर्वजण विचारत आहेत. मुख्यमंत्र्यांकडे जवळपास 40 हजार कोटी रुपयांची केंद्राचा निधी होता. जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेत आले असते, तर त्यांनी या 40 हजार कोटी रुपयांचा दुरुपयोग केला असता. त्यामुळेच हा निधी परत केंद्राकडे पाठवण्यासाठी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचे नाटक करण्याचे ठरले. त्यानुसार, फडणवीस हे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर १५ तासांत त्यांनी ४०,००० कोटी रुपयाचा हा निधी केंद्राला परत पाठवला, असा गौप्यस्फोट अनंतकुमार हेगडे यांनी केला.