
मुंबई-वृत्तसेवा । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून राज्याला नवे राज्यपाल मिळाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदेशानुसार जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने विविध राज्यांतील राज्यपालांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

जिष्णू देव वर्मा यापूर्वी तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रशासनिक आणि राजकीय अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित असलेल्या जिष्णू देव वर्मा यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर दीर्घकाळ राजकारणात सक्रिय भूमिका बजावली आहे.
जिष्णू देव वर्मा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता पक्षातून केली. 1990 च्या दशकात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून त्रिपुरामध्ये पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे काम केले. त्या काळात त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचे वर्चस्व असतानाही त्यांनी पक्षाला बळकटी देण्यासाठी व्यापक प्रचार आणि संघटनात्मक काम केले.
त्रिपुरातील त्रिपुरा ईस्ट मतदारसंघातून त्यांनी 1996, 1998 आणि 1999 या तीन वेळा निवडणूक जिंकून संसदेपर्यंत मजल मारली. पुढे ते त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही कार्यरत होते. या काळात त्यांनी ऊर्जा, ग्रामविकास यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कामकाजामुळे राज्यातील विकासकामांना गती मिळाल्याचे मानले जाते.
राजकीय क्षेत्रासोबतच जिष्णू देव वर्मा यांना साहित्य आणि क्रीडा क्षेत्राचीही विशेष आवड आहे. ते स्वतः एक चांगले लेखक आणि कवी म्हणूनही ओळखले जातात. सार्वजनिक जीवनातील अनुभव आणि विविध क्षेत्रांतील आवड यामुळे त्यांची एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
दरम्यान राष्ट्रपतींच्या आदेशानंतर महाराष्ट्रासह इतर काही राज्यांतील राज्यपालांमध्येही बदल करण्यात आले आहेत. पश्चिम बंगाल, नागालँड, तामिळनाडू, बिहार आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येही नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली असून नंद किशोर यादव यांची नागालँडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.



