अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कळमसरे (ता. अमळनेर) येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. कै. न्हानाभाऊ म.तु. पाटील कला महाविद्यालयाच्या वतीने आयोजित या सात दिवसांच्या निवासी शिबिरात युवक-युवतींना शाश्वत विकास, पाणलोट व्यवस्थापन, पडीत जमीन विकास यांसारख्या विषयांवर विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या दत्तक गावात महाविद्यालयाने तीन वर्षांसाठी युवकांसह गावाची काळजी घेण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.
दि. 16 जानेवारी रोजी या शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक जयदीपसिंग धनसिंग सिसोदिया यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरासाठी 50 शिबिरार्थींची निवड करण्यात आली असून ते सात दिवस विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहेत.

शिबिरादरम्यान युवक-युवती स्वच्छता अभियान, नशा मुक्ती, वनसंवर्धन, व्यक्तिमत्व विकास, आपत्ती व्यवस्थापन, बालविवाह प्रतिबंध, मतदार जनजागृती, सहज योग व ध्यान, राष्ट्रीय शिक्षण हक्क कायद्याविषयी जनजागृती तसेच जागो ग्राहक जागो मोहिमेवर काम करतील. याशिवाय गावातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचा उजाळा देखील यामध्ये समाविष्ट केला आहे. कार्यक्रमाचा अभ्यास कळमसरे येथील जि.प. मराठी शाळेत केला जात आहे.
उद्घाटन समारंभात ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, कळमसरेचे सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्र राजपूत, मारवड पोलीस ठाण्याचे सपोनि जिभाऊ पाटील, माजी जि.प. सदस्य शांताराम पाटील, कपिलेश्वर संस्थेचे सचिव मगन पाटील, कळमसरे जि.प. शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक किसनसिंग सिसोदिया, संस्थेचे उपाध्यक्ष देविदास साळुंखे, संचालक युवराज पाटील, सुरेश साळुंखे, महारू शिसोदे, सुरेश शिंदे, चंद्रकांत शिसोदे, राजेंद्र पाटील, पत्रकार बाबुलाल पाटील, शामकांत पाटील, हरिभाऊ मारवडकर, के.व्ही. पाटील, प्राचार्य डॉ. वसंत देसले, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, महमूदखॉं पठाण, जि.प. शाळेचे किशोर सिसोदे, कन्या शाळेचे मुख्याध्यापक केशव बडगुजर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजय महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी केले. या शिबिरामुळे युवकांमध्ये समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास याबाबत जागरूकता वाढणार असून गावात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठरले आहे.



