जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. मात्र, ही निवडणूक स्वबळावर लढायची की युती करायची, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतरच घेण्यात येईल, अशी महत्त्वाची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी दिली आहे.

‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना ॲड. देशपांडे यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली. “महापालिका निवडणुकीसाठी आमच्या कार्यकर्त्यांची आणि इच्छुकांची तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही प्रत्येक प्रभागात मोर्चेबांधणी केली आहे,” असे त्यांनी सांगितले.

मनसेचे वरिष्ठ नेते आणि पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून याबाबत नेमके कोणते आदेश येतात, याकडे सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. राज्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मनसे कोणती रणनीती स्वीकारते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ॲड. देशपांडे पुढे म्हणाले की, “आम्ही सध्या सर्व शक्यतांचा विचार करत आहोत. स्वबळावर लढल्यास किती जागांवर यश मिळू शकते, याचा अंदाज घेतला जात आहे. वरिष्ठ नेत्यांकडून योग्य मार्गदर्शन आणि आदेश मिळाल्यानंतरच आम्ही निवडणुकीतील आमची भूमिका अधिकृतपणे जाहीर करू.” एकंदरीत, मनसे जळगाव महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा देणार की, भाजप किंवा अन्य पक्षांसोबत हातमिळवणी करणार, याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.



