अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील टंचाईग्रस्त गांवाना जलसंजीवनी ठरणाऱ्या पांजरा नदीवरील अक्कलपाडा प्रकल्पाचे दुसरे आवर्तन मिळणार असून तालुक्यातील गावांना दुष्काळग्रस्त परिस्थितीत काहीप्रमाणात दिलासा मिळणार असून पिण्याच्या पाण्याची समस्येवर मात करणे काही अंशी मात करणे शक्य होणार आहे.
अक्कलपाडा प्रकल्पाचे आवर्तन मिळणार
तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पांजरा नदी काठावरील विहिवरून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. परंतु पांजरा काठावरील गांवाना सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. भूजल पातळी कमी झाल्यामुळे टँकर भरण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळेच तालुक्यात पाणी टंचाईने उग्र स्वरूप धारण केले होते. ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पाचे आवर्तन मिळणे आवश्यक होते. सदर मागणी अमळनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी आ. स्मिता वाघ यांची भेट घेऊन केली होती.आ. स्मिता वाघ यांनी नागरिकांची मागणी लक्षात घेता दिनांक (20 एप्रिल) रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन तसेच जळगांव व धुळे येथील जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी केली होती. ही मागणी मान्य होऊन अक्कलपाडा प्रकल्पाचे आवर्तन मिळणार असून तालुक्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे. मागणी मान्य केल्याबद्दल नागरिकांनी आ. स्मिता वाघ यांचे आभार व्यक्त केले तर आ. वाघ यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे.