Home राजकीय लोकसभेत पंतप्रधानांच्या भाषणाविना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्ताव मंजूर

लोकसभेत पंतप्रधानांच्या भाषणाविना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्ताव मंजूर


नवी दिल्ली-वृत्तसेवा । लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव गोंधळाच्या वातावरणात मंजूर करण्यात आला. २००४ नंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय हा प्रस्ताव मंजूर झाला. यापूर्वी १० जून २००४ रोजी विरोधकांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आभार प्रस्तावावर बोलू दिले नव्हते.

गुरुवारी लोकसभा सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढल्याने सभापतींनी कामकाज पहिल्यांदा ६५ सेकंदात, दुसऱ्यांदा ५ मिनिटांत आणि तिसऱ्यांदा २ मिनिटांत तहकूब केले. दुपारी ३ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले, मात्र विरोधकांचा गोंधळ कायम राहिल्याने लोकसभा शेवटी शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.

दरम्यान, काँग्रेसचे निलंबित खासदार माणिकम टागोर यांनी राहुल गांधी यांना लोकसभेत बोलण्याची परवानगी मिळेपर्यंत विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलू देणार नसल्याचे सांगितले.

बुधवारी संध्याकाळी लोकसभेचे कामकाज सुरू असताना महिला विरोधी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या आसनांना वेढा घातला. त्यांच्या हातात “जे योग्य आहे ते करा” असे लिहिलेले बॅनर होते. पंतप्रधान मोदी आभार प्रस्तावाला उत्तर देणार होते, परंतु विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज तहकूब झाले आणि त्यांचे भाषण होऊ शकले नाही.


Protected Content

Play sound