जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथराव खडसे यांनी, नेपाळमधील सत्तापालटाच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. नेपाळमधील सत्तापालटाचा उल्लेख करत खडसे म्हणाले की, “यापूर्वी श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान सत्तापालट झाली, आता तुमचा नंबर आहे,” असे थेट विधान करून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. जळगाव येथील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात गुरुवारी ११ सप्टेंबर) दुपारी १२ वाजता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले.
बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये रोष, खडसेंचे टीकास्त्र
आ. एकनाथराव खडसे यांनी आपल्या भाषणात, देशातील वाढत्या बेरोजगारीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “देशात तरुणांच्या हाताला काम नाही. त्यामुळे तरुणांमध्ये मोठा आक्रोश आणि उद्रेक निर्माण झाला आहे. याच उद्रेकामुळे नेपाळमधील सत्ता पलटली आहे.” यापूर्वी श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तानातही सत्तापालट झाल्याचे उदाहरण देत खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला. “गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले जात आहे, पण प्रत्यक्षात त्यांना कुठलेही काम मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे,” असे खडसे म्हणाले.

‘आता तुमचा नंबर आहे’, खडसेंचा इशारा
नेपाळमधील सत्तापालटाचा उल्लेख करत खडसे म्हणाले की, “यापूर्वी श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान सत्तापालट झाली, आता तुमचा नंबर आहे,” असे थेट विधान करून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. तरुणांना रोजगार देण्यात सरकार अपयशी ठरले असून, यामुळे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.



