जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगरसह जिल्ह्यातील ७७ गावे बाधित झाली. शेकडो नागरिकांचे स्थलांतर करावे लागले, तर हजारो हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त झाली. सुदैवाने, प्रशासनाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे सध्या परिस्थिती पूर्वपदावर आली आहे.
१७ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने आपत्तीग्रस्त भागाचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे सादर केला. या अहवालानुसार एकूण १४,०४० शेतकरी बाधित झाले असून, तब्बल ११,३७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका कापसाला (६,९०३ हेक्टर), मक्याला (१,७७३ हेक्टर) आणि केळीला (१,०३९ हेक्टर) बसला आहे. याशिवाय सोयाबीन, भाजीपाला आणि इतर पिकेही पाण्याखाली गेली आहेत.

या आपत्तीनंतर जिल्हा प्रशासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या ३५ जवानांची टीम तातडीने बाधित भागात पाठवली. दोन दिवसांत त्यांनी शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले, तसेच मदत कार्य राबवले. ई-पंचनामे ॲपच्या माध्यमातून शेतजमिनी, पिके व जनावरांचे पंचनामे करण्यात आले असून, उर्वरित पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील व किशोर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी मदत कार्याची पाहणी करताना शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला.
या आपत्तीत जिल्ह्यात एकूण तीन मृत्यूंची नोंद झाली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावातील किरण मधुकर सावळे या युवकाचा पूराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला तत्काळ चार लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत देण्यात आला. भुसावळ व पाचोरा तालुक्यातील मृतांच्या कुटुंबीयांनाही शासन नियमानुसार मदत देण्यात येणार आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सर्व बाधित शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदतीसाठी पंचनामे त्वरेने पूर्ण करून शासनाकडे पाठवले जातील. तसेच, कोणत्याही बाधित व्यक्तीला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी हमी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



