जिंकले : भारत टि-२० विश्‍वचषक स्पर्धेचा विजेता

बार्बाडोस-वृत्तसेवा | विराट कोहलीने केलेल्या दमदार फलंदाजीमुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टि-२० विश्‍वचषक पटकावला आहे.

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना आज बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल ब्रिजटाउन मैदानावर होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आज नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. मात्र भारताचे तीन फलंदाज लवकरच बाद झाले. यानंतर विराट कोहली याने जोरदार फटकेबाजी केली. त्याने ५६ चेंडूंमध्ये ७६ धावा केल्या. त्याला अक्षर पटेल याने ४७ तर शिवम दुबे याने २७ धावांची खेळी करत समर्थ साथ दिली.

दरम्यान, हे आव्हान घेऊन उतरलेल्या दक्षीण अफ्रिकेची सुरूवात खराब झाली. दुसर्‍याच षटकात जसप्रीत बुमराह याने रीझा हेंड्रीक याला बाद केले. तर पुढच्याच षटकात अर्शदीपने दक्षीण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमचा बळी टिपला. यानंतर क्विंटन डीकॉक आणि स्टब्स या जोडीने डाव सावरला. यात स्टब्जला अक्षर पटेलने ३१ धावांवर त्रिफळाचीत केले. यानंतर डीकॉकने जोरदार फटकेबाजी केली. मात्र तो ३९ धावा करून बाद झाल्यावर डेव्हीड मिलर आणि क्लासन यांनी डाव सावरला.

त्यांनी भारतीय फिरकी गोलंदाजांना झोडपून काढले. क्लासनने ५२ धावा केल्या असतांना हार्दीकने त्याला बाद केल्यानंतर भारताच्या थोड्या आशा पल्लवीत झाल्या. यातच अठराव्या षटकात बुमराहने जॅन्सनला त्रिफळाचीत केले. यानंतर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी १६ धावांची आवश्यकता होती.

शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मिलरचा विलक्षण झेल सुर्यकुमार यादव याने घेतल्यावर भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. शेवटच्या षटकात हार्दीक पांड्या याने अतिशय टिच्चून गोलंदाजी केली. त्याने मिलरच्या पाठोपाठ रबाडा याचा देखील बळी घेतला. शेवटच्या दोन चेंडूवर दहा धावांची आवश्यकता असतांना आफ्रिकन फलंदाज हे करू न शकल्याने भारताने टि-२० विश्‍वचषकात दणदणीत विजय संपादन केला.

Protected Content