
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “गावांचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, महिला सशक्तीकरण आणि सांस्कृतिक प्रगती हेच ग्रामीण भागाच्या खऱ्या अर्थाने प्रगतीचे आधारस्तंभ आहेत,” असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव तालुक्यातील जळके व विटनेर येथे आयोजित विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमात जळके येथील वसंतवाडी गावाजवळ ६० लाख रुपये निधीतून बांधलेल्या लोकल नाल्यावर संरक्षक भिंतीचे लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर, जिल्हा परिषद शाळेच्या ११.५० लाख रुपये निधीतून बांधलेल्या इमारतीचे आणि महादेव मंदिर परिसरात १० लाख रुपये निधीतून साकारलेल्या पेव्हिंग ब्लॉक व सुशोभीकरण कामांचेही लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. याशिवाय, विटनेर येथील जिल्हा परिषद शाळेच्या ११.५० लाख रुपये निधीतून उभारल्या जाणाऱ्या नवीन इमारतीचे भूमिपूजनही मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित कामगार महिलांना भांडी संच आणि शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटपही पालकमंत्र्यांनी केले. “गावच्या मातीशी माझे भावनिक नाते आहे,” असे सांगत पालकमंत्री पाटील म्हणाले, “गावात मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेसह दर्जेदार शिक्षण पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. गरजेनुसार निधी कमी पडू दिला जाणार नाही.” आज केवळ इमारतींचे नव्हे, तर नव्या आशा-स्वप्नांचे लोकार्पण होत आहे, असेही त्यांनी नमूद केले. महिलांना दिलेले भांडी संच त्यांच्या कष्टमय जीवनात थोडी मदत ठरेल, तर विद्यार्थ्यांना दिलेल्या वह्या शिक्षणासाठी प्रेरणा देतील, असेही पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. के. पाटील यांनी केले, तर दूध संघाचे संचालक रमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शन सरपंच स्नेहा साठे यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद माजी सदस्य पवन सोनवणे, उपजिल्हा प्रमुख रवी कापडणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, माजी उपसभापती साहेबराव वराडे, सरपंच स्नेहा साठे, माजी सरपंच नितीन जैन, वसंतवाडी सरपंच विनोद पाटील, उपसरपंच सोपान सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक पाटील, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, विटनेर ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ जाधव, योगेश गुंजाळ, सुरेश गोलांडे, सागर परदेशी, राजू परदेशी, श्यामसिंग परदेशी, भूषण पाटील, सरपंच राजूभैय्या पाटील, उपसरपंच सुशीलाबाई पाटील, कवीश्वर पाटील, सागर दिवाणे, नारायण पाटील, सुभाषवाडी सरपंच राजाराम राठोड, लोणवाडी सरपंच बाळू धाडी, वराड उपसरपंच राजू जाधव, अर्जुन पाटील, सचिन पाटील, जितेंद्र पाटील, संदीप सुरळकर, रामकृष्ण काटोले, मागासवर्गीय सेना तालुका उपाध्यक्ष सुनील ब्राम्हणे, महिला तालुका अध्यक्षा अनिता चिमणकरे तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



