
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्यासाठी आज दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वाधिक 52.37 टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये तर सर्वात कमी 29.94 टक्के मतदान महाराष्ट्रात झाले होते.

चौथ्या टप्प्यात 9 राज्यांमध्ये 71 जागांसाठी मतदान होत आहे. यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर दुपारी दोनपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारीनुसार बिहारमध्ये 37.71, मध्य प्रदेश 43.44, महाराष्ट्र 29.94, ओडिशा 35.79, राजस्थान 44.62, उत्तर प्रदेश 34.42, पश्चिम बंगाल 52.37, झारखंड 44.90 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, असनसोलमध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सुरक्षा दलात हाणामारी झाल्याचेही वृत्त समोर आले आहे. यावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद पेटल्याचे देखील कळते. यात भाजप उमेदवार बाबुल सुप्रियो यांच्या वाहनाची तोडफोड देखील करण्यात आली. असनसोल येथे बाबुल सुप्रियो यांना तृणमूलच्या उमेदवार मुनमुन सेन आव्हान देत आहेत.


