नांदेड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा “हिंद-दी-चादर” हा कार्यक्रम केवळ मराठवाडा किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर भारताची श्रद्धा, बलिदान आणि मानवी मूल्यांची महान परंपरा अधोरेखित करणारा ऐतिहासिक सोहळा ठरणार असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त हा भव्य कार्यक्रम होत असून देश-विदेशातील भाविक, संत-महात्मे आणि मान्यवरांचे लक्ष या कार्यक्रमाकडे वेधले जाणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रसिद्धी व माध्यम नियोजनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विभागीय आयुक्त पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, लातूरचे उपसंचालक (माहिती) विवेक खडसे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, लातूर जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, सहायक संचालक श्याम टरके यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभागीय आयुक्त पापळकर यांनी पुढे सांगितले की, “हिंद-दी-चादर” हा कार्यक्रम प्रत्येक गाव, प्रत्येक घर आणि प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व माध्यमांनी समन्वयाने, सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य करणे गरजेचे आहे. माध्यमांची भूमिका या ऐतिहासिक उपक्रमात अत्यंत महत्त्वाची असून समाजाला योग्य दिशा देण्याचे सामर्थ्य माध्यमांकडे आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहिष्णुता, त्याग आणि मानवतेचे मूल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची मोठी संधी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या व्यापक व सखोल नियोजनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन, सुरक्षा व्यवस्था, भाविकांसाठी सुविधा तसेच प्रसिद्धी याबाबत प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी माध्यमांनी सेवेच्या भावनेतून सकारात्मक आणि जबाबदार योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीदरम्यान माध्यम प्रतिनिधींनी कार्यक्रमासंदर्भात आपली मते मांडली तसेच आयोजन करताना येणाऱ्या अडचणी, सूचना आणि अपेक्षांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासन आणि माध्यमे यांच्या समन्वयातून “हिंद-दी-चादर” हा कार्यक्रम राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



