जळगाव प्रतिनिधी । अथानांवर आधीच संकटांचा डोंगर असतांना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास शासनाने खर्च करावा अशी मागणी प्रहार अनाथ संघटनेतर्फे करण्यात आली असून याबाबत आज महापौर जयश्री महाजन यांना निवेदन देण्यात आले.
प्रहार अनाथ संघटना जळगाव यांच्या तर्फे आज जळगाव महापौर जयश्रीताई महाजन यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, अठरा वर्षानंतर बाहेर पडलेल्या अनाथांची परिस्थिती आधीच अतिशय बिकट असून शासनाकडून नेहमीच दुर्लक्षित राहिलेला घटक आहे. त्यात गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देशात करोना या विषाणूने थैमान घातले आहे. अशातच शासनाकडून कडक निर्बंध आणि लॉक डाऊन नेहमीच घोषित करण्यात येत आहे. अशातच जर या अनाथांना करोना विषाणूची लागण होत असल्यास इतर सामान्य रुग्णां सारखा अवाढव्य खर्च त्यांना झेपणार नाही.

म्हणून कृपया राज्यातील बालगृहे आणि अनाथ आश्रम मध्ये असलेल्या आणि तेथून बाहेर पडलेल्या अनाथांना करोना विषाणू ची बाधा होत असल्यास त्याचा संपूर्ण वैद्यकीय खर्च हा शासनाने करावा अशी मागणी अनाथ प्रहार संघटना जळगाव यांच्यातर्फे करण्यात आली. यावेळी निवेदन देताना अनाथ प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष जळगाव अमोल पाटील, उपजिल्हाध्यक्ष संगपाल किर्तीकर, भूषण पिंगळे तालुकाध्यक्ष एरंडोल, शुभम सोनवणे आदी उपस्थित होते.


