जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक साक्षरता दिनानिमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) युनिटतर्फे आयोजित कार्यक्रमात “सर्वांसाठी साक्षरता : सशक्ततेकडे वाटचाल” या संकल्पनेचा प्रभावी अविष्कार पाहायला मिळाला. या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून केवळ साक्षरतेचा संदेश नव्हे, तर शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती व समाज सशक्त होऊ शकतो, हा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात रासेयो कार्यक्रम अधिकारी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी आपल्या भाषणातून साक्षरतेचे सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातील महत्त्व अधोरेखित करत, प्रत्येकाने साक्षरतेच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. यानंतर रासेयो स्वयंसेवकांनी परिसरातील अशिक्षित महिलांना आणि वयोवृद्ध नागरिकांना उद्देशून प्राथमिक साक्षरता वर्ग राबवले. या वर्गांमध्ये त्यांनी वाचन, लेखन आणि प्राथमिक गणित शिकवले. यासाठी रंगीत चार्ट, संवादात्मक प्रशिक्षण पद्धती, आकृती आणि कृती यांच्या साहाय्याने शिक्षण प्रक्रिया प्रभावी केली गेली.

स्वयंसेवकांनी तयार केलेल्या पोस्टर, बॅनर आणि माहितीपत्रकांच्या प्रदर्शनाद्वारे साक्षरतेचे महत्व दाखवण्यात आले. “आजीवन शिक्षणाचा मार्ग”, “साक्षरतेमुळे मिळते आत्मसन्मान” आणि “सशक्तीकरणाचे साधन – शिक्षण” यांसारखे संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात आले. विशेषतः महिलांसाठी आयोजित चर्चासत्रात शिक्षकांनी शिक्षणामुळे मिळणारा आत्मविश्वास, आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबन यावर भाष्य केले.
वाचन वर्तुळ या उपक्रमात स्वयंसेवकांनी नैतिक कथा आणि प्रेरणादायी लेख वाचून दाखवले. या कृतीमुळे वाचनाची गोडी निर्माण होऊन, संवादाच्या नव्या शक्यता खुल्या झाल्या. या संपूर्ण उपक्रमात ७० हून अधिक रासेयो स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आणि आपल्या सामाजिक बांधिलकीची ठोस प्रचिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांमध्ये सकारात्मक ऊर्जा, साक्षरतेबाबत जागरूकता आणि शिक्षणाच्या महत्त्वाची प्रबळ जाणीव निर्माण झाल्याचे जाणवले. महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट साध्य होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.



