चोपडा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आडगाव गावाचे माजी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब ताराचंद पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय ग्रामविकास कार्यासाठी नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेचा ग्राम समृद्धी योजना राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या गौरवाने केवळ आडगाव गावाचीच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याची मान उंचावली आहे.
नालंदा ऑर्गनायझेशनने ग्रामीण भागात समृद्धी साधणाऱ्या विविध प्रकल्पांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन हा पुरस्कार दिला. रावसाहेब पाटील यांनी सरपंचपदाच्या कार्यकाळात विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून आडगावमध्ये विकासाचे नवे आयाम उभारले. त्यांच्या कार्यात त्यांच्या धर्मपत्नी सौ. कल्याणी पाटील यांनीही महत्त्वपूर्ण पाठिंबा दिला. या दोघांनाही एकत्रितपणे हा सन्मान देण्यात आला, ही गोष्ट विशेष उल्लेखनीय आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्याला निवृत्त कृषी सहसंचालक श्रीपाद माणिकराव खळीकर (नवी दिल्ली), जितेंद्र दाते, विनोद वनवे, अभिजीत आहेर, अभिजीत चौधरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. संपूर्ण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. हा पुरस्कार रावसाहेब पाटील यांना मिळाल्याने चोपडा तालुका व आडगाव गावात आनंदाचे वातावरण आहे.
भारतीय जनता पक्षाच्या विविध वरिष्ठ नेत्यांनी रावसाहेब पाटील यांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. स्थानिक शेतकरी संघाचे अध्यक्ष सुनील डोंगर पाटील, चोपडा साखर कारखान्याचे संचालक पंडित रामदास पाटील, शेतकी संघाचे संचालक शामकांत पाटील, तसेच प्रगतिशील शेतकरी अंबादास पाटील, दामोदर पाटील, पोलीस पाटील संगीता गोविंद पाटील यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
डॉ. विजय पाटील, राजेंद्र विठ्ठल पाटील, मंगल हिरामण पाटील, राजेंद्र पाटील, मधु पाटील, मंगल तात्या, कैलास पाटील, छोटू वार्डे आदी ग्रामस्थांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत रावसाहेब पाटील यांचा सन्मान हे आडगावसाठी अभिमानाचे पाऊल असल्याचे म्हटले.



