पराभवाची जबाबदारी स्वीकारली फडणवीसांची राजीनाम्याची तयारी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून देश पातळीवर भारतीय जनता पक्षप्रणीत एनडीएला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचं जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, त्याचवेळी महाराष्ट्रात भाजपाला अपेक्षित यश मिळवण्यात अपयश आले. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची २०१९ च्या २३ जागांवरून ९ जागांपर्यंत पीछेहाट झाली. तसेच, महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचं अपयश हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मोठे भाष्य केले आहे.

आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याचं मान्य केले आहे. तसेच, या पराभवाची संपूर्ण जबाबदारी आपली असल्याचे ते म्हणाले आहेत. “कितीही गणिते मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावं लागेल. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो. त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील, त्याची जबाबदारी माझी आहे. मी मान्य करतो की मी स्वत: यात कमी पडलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. भाजपाला महाराष्ट्रात सामना कराव्या लागलेल्या स्थितीची सगळी जबाबदारी मी स्वीकारत आहे. आता मला विधानसभेत पूर्णवेळ उतरायचे आहे. त्यामुळे मी भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळे करावे आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी. त्यानंतर पक्षनेतृत्व जे सांगेल, त्यानुसार मी सगळे करणार आहे”असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

सध्या देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद व इतर महत्त्वाच्या खात्यांचा कारभार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला या सर्व जबाबदाऱ्यांमधून मोकळं करून राज्यात पक्षाच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी भाजपाच्या नेतृत्वाकडे केली आहे. तसेच, फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर फक्त अजित पवार हेच एकमेव उपमुख्यमंत्री राहतील, असंही सांगितलं जात आहे.

Protected Content