यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चुंचाळे गावात भगवान महाराज यांच्या चरण पादुकांच्या दिंडीचे आगमन होताच संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदंगांचा निनाद आणि भाविकांची गर्दी यामुळे परिसरात उत्साहाचे व पवित्रतेचे वातावरण निर्माण झाले होते.
जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील महर्षी वाल्मीक आश्रमातून निघालेल्या भगवान महाराज व रावसाहेब महाराज यांच्या चरण पादुका दिंडीचे चुंचाळे येथील श्री समर्थ वासुदेव बाबा दरबारात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी दर्शन घेत भजन-कीर्तनात सहभाग नोंदवला. दिंडीच्या स्वागतासाठी मंदिर परिसर सजवण्यात आला होता, तर महिलांसह युवक-युवतींनीही भक्तीभावाने सहभाग घेतला.

दिंडीसोबत आलेल्या भाविकांसाठी मंदिराच्या पटांगणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आरती व भजनानंतर पायी दिंडीचे प्रस्थान पुढील गाव भालशिव पिंप्रीकडे करण्यात आले. या दिंडी सोहळ्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अखंड सुरू असल्याची माहिती दिंडी प्रमुख राष्ट्रीय कीर्तनकार गजानन महाराज धानोरेकर यांनी दिली.
या पायी दिंडीत शेकडो महिला व पुरुष भाविक सहभागी झाले असून सर्वांनी शिस्तबद्धपणे व भक्तीभावाने मार्गक्रमण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी प्रकाश चौधरी, प्रल्हाद पाटील, देवचंद कोळी, चंद्रकांत चौधरी, किरण तेली, संजय चौधरी, नथ्थु धनगर, मयाराम धनगर, पंडित कोळी, वाय. वाय. पाटील, हिरालाल राजपूत, अरुण कोळी, संजय कोळी, समाधान राजपूत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



