
धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरात भारतीय संविधानाचा आदर व गौरव करण्यासाठी मुख्य रस्त्यावर ‘संविधान चौक’ उभारण्याची मागणी संविधान समितीच्या सदस्यांनी मंगळवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्याकडे केली आहे. संविधान समितीच्या वतीने यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून, शहरातील सर्व समाजबांधवांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. हा चौक शहराच्या सौंदर्यात भर घालेल आणि भावी पिढ्यांना संविधानाचे महत्त्व शिकवेल, अशी भावना समितीने व्यक्त केली आहे.

संविधानाचे महत्त्व सांगणारा उपक्रम
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून, ते देशाचा आत्मा आहे. संविधानानेच भारत विविधतेतही एकसंध राहिला आहे. प्रत्येक नागरिकाला समानता, न्याय आणि हक्क प्रदान करण्याचे काम संविधान करते. लोकशाही, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची मूल्ये जिवंत ठेवण्यासाठी संविधान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे असा चौक उभारल्यास तो भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल आणि त्यांना आपल्या अधिकारांची व कर्तव्यांची जाणीव करून देईल.
स्थानिक समितीकडून मागणी
या मागणीच्या वेळी संविधान समितीचे सदस्य दीपक वाघमारे, भानुदास विसावे, बापू मोरे, सुनील चव्हाण, पापाशेट वाघरे, नासिर मोमीन, बाळू जाधव, अजय मैराळे, सुधाकर साळुंखे, धर्मराज मोरे, अविनाश बाविस्कर, चेतन वाघरे, सागर भील, शिवा भील, प्रल्हाद चव्हाण, अशरफ भाई मोमीन आणि शहीद भाई मोमीन आदी उपस्थित होते. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे या मागणीवर गांभीर्याने विचार करून सकारात्मक प्रतिसाद देण्याची विनंती केली.



