मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत येणाऱ्या आदिशक्ती संत मुक्ताई पालखी आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, मुरूम भराव, मोबाईल टॉयलेटची उपलब्धता व पोलिसांकडून मानवंदनेची मागणी करण्यात आली आहे. दिनांक ३० जुलै २०२५ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथून परतणाऱ्या पालखी सोहळ्याचे मुक्ताईनगर येथे भव्य स्वागत होणार असून, महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील २०० पेक्षा अधिक दिंड्यांचा सहभाग अपेक्षित आहे.
या पावन प्रसंगी मुक्ताईनगर शहरात एक भव्य दिंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या आदिशक्ती संत मुक्ताई उड्डाणपूल परिसरात, मुक्ताई चौकात आणि संपूर्ण दिंडी मार्गावर स्वच्छतेची तातडीची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत आणि घनकचरा त्वरित हटवावा अशी मागणी करण्यात आली आहे.

दिंडी मार्गावरील काही रस्त्यांचे काम अद्याप अपूर्ण असून, विशेषतः आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मार्गावर दोन ते तीन ठिकाणी चिखल तयार झाला आहे. त्यामुळे त्या भागात तात्पुरत्या स्वरूपात मुरूम भराव करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे. याशिवाय, वारकऱ्यांच्या स्वच्छतेसाठी मोबाईल टॉयलेट्सची पुरेशी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने मुक्ताईनगर पोलीस प्रशासनाकडेही अशी नम्र विनंती करण्यात आली आहे की, जर नियमानुसार शक्य असेल, तर संत मुक्ताई पालखीच्या नगरप्रवेशप्रसंगी पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात यावी. या मागणीला धार्मिक व सांस्कृतिक अधिष्ठान असून, यामुळे पालखी सोहळ्याला एक सन्माननीय आणि शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
वरील मागण्यांचा विचार करून पालखी सोहळा शिस्तबद्ध, स्वच्छ आणि भाविकांसाठी सुबध्द होईल, यासाठी संबंधित प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली. या निवेदनावर लक्ष्मण रमेश सापधरें, संचालक आरडीएस ग्रुप ऑफ बिझनेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आले आहे.



