जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने कडक तयारी सुरू केली आहे. मतदान तसेच मतमोजणी शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी रोहन घुगे यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ (२) नुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार जिल्ह्यात १ डिसेंबर रात्री १०.०५ वाजेपासून ते ३ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या हेतूने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या आदेशान्वये मतदान केंद्रांच्या परिसरात अनधिकृत जमाव, मोर्चे, प्रचार रॅली किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचे कोणतेही एकत्रित जमणे संपूर्णपणे प्रतिबंधित केले आहे. निवडणूक काळात उद्भवू शकणाऱ्या तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र निवडणुकीसंबंधित कर्तव्ये पार पाडणारे अधिकारी व कर्मचारी यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
प्रशासनाने मतदार व नागरिकांना आवाहन केले आहे की निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी पूर्ण सहकार्य करावे. कोणताही गैरप्रकार, अपप्रचार, वाद निर्माण करणारी कृती किंवा सोशल मीडियाद्वारे दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात येऊ नये असेही आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात शांतता राखणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाने अधोरेखित केले आहे.



