Home राज्य CBSE दहावी बोर्ड परीक्षा २०२६: विज्ञान-सामाजिक शास्त्रात मोठे बदल

CBSE दहावी बोर्ड परीक्षा २०२६: विज्ञान-सामाजिक शास्त्रात मोठे बदल


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या बोर्ड परीक्षांसाठी महत्त्वाचे आणि व्यापक बदल जाहीर केले असून, परीक्षा पद्धतीत शिस्त व पारदर्शकता आणण्यावर भर दिला आहे. विशेषतः विज्ञान आणि सामाजिक विज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका रचनेत मोठे बदल करण्यात आले असून, उत्तरलेखनातील चुकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात येणार आहेत.

सीबीएसईने स्पष्ट केले आहे की दहावीची विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका आता जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र अशा तीन स्वतंत्र विभागांमध्ये विभागली जाईल. त्याचप्रमाणे सामाजिक विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र अशा चार वेगवेगळ्या विभागांत असणार आहे. हा नवीन परीक्षा पॅटर्न थेट २०२६ च्या बोर्ड परीक्षांपासून लागू होणार असून सर्व संलग्न शाळांना त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उत्तरलेखनाबाबत बोर्डाने अत्यंत कडक नियम जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयासाठी उत्तरपत्रिका तीन आणि सामाजिक विज्ञानासाठी चार ठरावीक विभागांमध्येच विभागून उत्तर लिहावे लागणार आहे. प्रत्येक विभागाची उत्तरे केवळ त्याच विभागात दिलेल्या जागेत लिहिणे बंधनकारक असेल. एखाद्या विद्यार्थ्याने एका विभागातील उत्तर दुसऱ्या विभागात लिहिले किंवा वेगवेगळ्या विभागातील उत्तरे एकत्रितपणे मांडली, तर अशा उत्तरांचे मूल्यांकन केले जाणार नाही आणि त्यांना गुण दिले जाणार नाहीत, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षा निकालानंतर होणाऱ्या पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकन प्रक्रियेतही अशा चुका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. चुकीच्या विभागात लिहिलेले उत्तर नंतर दुरुस्त करण्याची कोणतीही संधी विद्यार्थ्यांना मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तरलेखन करताना अधिक काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे. बोर्डाच्या मते, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्तरलेखनाबाबत शिस्त निर्माण होईल आणि मूल्यांकन प्रक्रियेत होणाऱ्या तांत्रिक चुका कमी होतील.

सीबीएसईने सर्व शाळांना या नव्या परीक्षा पद्धतीची आगाऊ तयारी करून देण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासादरम्यानच विभागनिहाय उत्तरे लिहिण्याचा सराव करून देण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून प्रत्यक्ष परीक्षेत गोंधळ होणार नाही. तसेच विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या अद्ययावत नमुना प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

बोर्डाच्या मते, नमुना प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत दिलेली गुणांकन योजना विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, विभागांची रचना, प्रश्नांचे प्रकार आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी आवश्यक असलेली उत्तर मांडणी समजून घेण्यास मदत करेल. चुकीची माहिती टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केवळ अधिकृत सीबीएसई स्रोतांवरच अवलंबून राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 


Protected Content

Play sound