मुंबई-वृत्तसेवा | महाराष्ट्रात आजपासून बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू झाल्या आहेत. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीतील सोहम कटरे या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कळवा–मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान चालत्या लोकलमधून पडून हा अपघात घडल्याची माहिती आहे.
सोहम हा बारावीच्या पहिल्या पेपरसाठी कळवा येथील मनिषा विद्यालयात जात होता. सकाळच्या वेळेत लोकलमध्ये मोठी गर्दी होती. गर्दीमुळे तोल जाऊन तो खाली पडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या अपघातात सोहमचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे कटरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




