नवी दिल्ली प्रतिनिधी । देशात यंदा कांद्याचे उत्पन्न कमी झाल्याने किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. देशातील बाजारांमध्ये मुबलक प्रमाणात कांद्याचा पुरवठा होत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या अनेक दिवसांपासून देशात कांद्याची आवक कमी झालेली आहे. सततच कांद्याचे भाव वाढत असल्याचे चित्र अनेक दिवसांपासून पाहवयास मिळत आहे. यंदा कांद्याचे कमी उत्पन्न झाल्यानेच केंद्र सरकारने मागणी तसा पुरवठा हे तत्त्व पाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. देशातील विविध बाजारपेठेत एव्हाना दक्षिण भारतातून येणार कांदा ही अद्याप दाखल झालेला नाही. राज्यातील कांदाही उत्तर प्रदेश आणि परदेशात जाऊ लागला आहे. अशा परिस्थितीत कांद्याचे भाव गगनाला भिडून कांद्याची वानवा निर्माण होऊ नये असा सरकारचा प्रयत्न आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीला मात्र शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. याचे कारण म्हणजे कांदा निर्यात बंदीचा थेट परिणाम शेतकरी आणि कांदा उत्पादकांवर होणार आहे. यापूर्वीच सरकारने निर्यात मुल्यात वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. आता निर्यातच बंद केल्याने शेतकऱ्यांना मिळणार कांद्याचा भाव कोसळणार आहे