नवी दिल्ली, वृत्तसंस्था | समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र त्यांनी लोकसभेत आज अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अनुपस्थितीत अध्यक्षपदी विराजमान झालेल्या रमा देवी यांच्याविषयी एक आक्षेपार्ह विधान केल्याने सभागृहात खळबळ माजली होती.
आझम खान यांनी माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय विधी मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यासह अनेक नेत्यांनी लावून धरली. आझम यांच्या वादग्रस्त शेऱ्यामुळे रमा देवी यांनाही अवघडल्यासारखे झाले आणि यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुन्हा कामकाज हाती घेतले.
आझम खान बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा ते म्हणाले की, मुख्तार अब्बास नक्वी कुठे आहेत, यावर रमा देवी म्हणाल्या की तुम्ही इकड-तिकडच्या गप्पा करू नका, थेट खुर्चीकडे बघून आपला विषय मांडा. यावर आझम खान यांनी आक्षेपार्ह विधान केले. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. भाजपसह अनेक पक्षांच्या खासदारांनी आझम खान यांच्या विधानाला आक्षेप घेत त्यांना माफी मागण्यास सांगितले.