अतुल पाटलांनी सोडविल्या आदिवासी वस्तीतील समस्या

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरातील बोरावल गेट भागात आदिवासी भिल्ल समाजाची वस्ती आहे. या भागात अनेक समस्या आहेत. या समस्या जाणुन घेण्यासाठी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी, म्हणून त्या भागातील नागरिकांनी गळ घातली होती. त्यानुसार अतुल पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून समस्या जाणून घेऊन नगरपालिका संबधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळी बोलावून घेतले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल येथील आदिवासी भिल्ल समाज वस्ती मध्ये शांती नगर म्हणून भाग आहे तेथील नागरिकांच्या आग्रहास्तव पालिकेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी आज कार्यकर्त्यांसह भेट देऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान अनेक समस्या निदर्शनास आल्याने त्यांनी पालिकेचे आरोग्य अधिकारी व पाणी पुरवठा अभियंता सत्यम पाटील, कर्मचारी कमील शेख, अजय मेढे, यांना प्रत्यक्ष स्थळी बोलावून घेतले. परिसरात महिला व पुरुषांनी त्या भागात नळ घेण्यासाठी पाइप लाइन नसल्याने ती टाकून मिळावी अशी मागणी केली.

एकाही घरामध्ये वैयक्तिक शौचालय नसून सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावे अशी मागणी केली आहे. परिसरात असलेले पथदिवे चार ते पाच वर्षापासून बंद असुन आम्हाला कोणीही वाली नाही अशी खंत व्यक्त करून नगरपालिकेवर नाराजी व्यक्त केली. या भागांतील गटारी दोन दोन तीन तीन महिने सफाई केली जात नाही. या सर्व बाबी लक्षात घेता तत्काळ वीज कर्मचारी यास बोलावून त्या भागांतील तीन खांबावरील बंद पथदिवे बसविण्यात आले व गटारीची नियमित साफसफाई केली जाणार असल्याचे अभियंता सत्यम पाटील यांनी संबधीत सफाई कामगार यांना सुचित केले आहे तर लवकरच या भागात शौचालयाचे बांधकाम करण्याची मान्यता मिळवून पाइप लाइन देखील टाकण्यात येईन असे मान्य केले आहे. याप्रसंगी किशोर माळी, नरेंद्र शिंदे, भुषण खैरे, सखाराम भिल्ल, चेतन भिल्ल, इ कार्यकर्ते हजर होते.

Protected Content