आशियातील सर्वात मोठा साउंडप्रुफ पुल मुसळधार पावसामुळे तुटला

भोपाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मध्य प्रदेशात सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. सार्वजनिक मालमत्तेवरही याचा परिणाम दिसून येत आहे. पावसामुळे इथल्या सिवनी जिल्ह्यातील आशियातील सर्वात मोठा आणि देशातील पहिला साउंडप्रूफ पूलही तुटला आहे. त्यामुळे एका बाजूने वाहतूक बंद ठेवावी लागली. आशियातील सर्वात मोठा आणि देशातील पहिला ध्वनीरोधक पूल सिवनी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 44 वर बांधण्यात आला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 44 सिवनी जिल्ह्यातून जातो आणि हा ध्वनीरोधक पूल याच महामार्गाचा एक भाग आहे. जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे या साऊंड प्रूफ पुलाची दुरवस्था झाली आहे. आता त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, त्यामुळे महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत आहे.

सिवनी ते नागपूर मार्गावर पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलांमध्ये हा आशियातील सर्वात मोठा साउंडप्रूफ पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून वाहने वेगाने धावतात, मात्र पुलाखाली वाहनांचा आवाज ऐकू येत नाही. त्यावर लाइट रिड्यूसरही बसवण्यात आला आहे. त्यावर वन्यजीवांसाठी 14 प्राणी अंडरपासही बांधण्यात आले आहेत. 29 किलोमीटर लांबीचा हा पूल 960 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. तो दिलीप बिल्डकॉन या खासगी कंपनीने बांधला होता. त्यांनी या पुलासाठी 10 वर्षांची हमी दिली होती, मात्र अवघ्या 5 वर्षांत तो पावसात तग धरू शकला नाही आणि अनेक ठिकाणी तुटला आहे. मुसळधार पावसामुळे या पुलावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत.

Protected Content