अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा; धनंजय महाडिकांची राज्यसभेत मागणी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | समाजातील शोषित आणि दुर्लक्षित वर्गासाठी आपल्या लेखणीतून आवाज उठवणाऱ्या आणि सामाजिक न्यायाची चळवळ मजबूत करणाऱ्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी राज्यसभेत केली.

अण्णाभाऊ साठे यांचे केवळ साहित्यिक योगदान नसुन, सामाजिक परिवर्तनामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. आण्णाभाऊ साठे यांनी ३५ कादंबर्‍या, १० लोकनाट्ये, २४ लघुकथा, १० पोवाडे, एक नाटक आणि प्रवास वर्णन लिहिले. बालविवाह आणि हुंडा प्रथेला विरोध, अंधश्रध्दा निर्मुलन, जातीय भेदभावाला विरोध, श्रमिकांचा संघर्ष याबाबत त्यांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवला. त्यांच्या साहित्याचा रशियन, जर्मन, पॉलिश भाषेत अनुवाद झाला. तर महिला, दलित, शोषित, पिडीत यांच्या उध्दारासाठी त्यांनी प्रयत्न केले.

अण्णाभाऊ साठे यांचे समाज परिवर्तनासाठी केवळ साहित्यिक योगदान नाही तर सामाजिक स्तरावरही त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी आग्रही मागणी महाडिक यांनी केली.

Protected Content