Home न्याय-निवाडा मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपी निर्दोष !

मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपी निर्दोष !


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । 2006 साली मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींना बॉम्बे हायकोर्टाने निर्दोष ठरवत आज मोठा निकाल दिला. न्यायालयाने नमूद केले की, आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे आणि विश्वासार्ह पुरावे नसल्यामुळे दोषसिद्धी रद्द करण्यात येत आहे.

न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने सांगितले की, “अभियोजन पक्ष पूर्णतः अपयशी ठरला आहे आणि उपलब्ध पुराव्यांवरून आरोपींनी हा गुन्हा केल्याचे मानणे कठीण आहे. त्यामुळे त्यांची दोषसिद्धी रद्द करण्यात येते.”

हायकोर्टाने 2015 मध्ये विशेष न्यायालयाने दिलेल्या मृत्युदंड व जन्मठेपेच्या शिक्षा रद्द करत सांगितले की, जर आरोपी इतर कोणत्याही गुन्ह्यांमध्ये वॉंछित नसतील, तर त्यांची तत्काळ सुटका करण्यात यावी.

11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांवर सात ठिकाणी लोकल गाड्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या भयानक हल्ल्यात 180 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण गंभीर जखमी झाले होते. 2015 मध्ये या प्रकरणी विशेष न्यायालयाने 12 आरोपींना दोषी ठरवले होते. यामधील पाच जणांना मृत्युदंडाची तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

आज हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर राज्यभरातील विविध तुरुंगांतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपींनी न्यायालयात हजेरी लावली आणि आपल्या वकिलांचे आभार मानले.


Protected Content

Play sound