
धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील साळवा-साकरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या वतीने “गाव तेथे राष्ट्रवादी” हा संपर्क अभियान अत्यंत उत्साहात आणि प्रभावीरीत्या पार पडला. या अभियानातून पक्षाच्या विचारधारेचा प्रचार आणि संघटनवाढीचे उद्दिष्ट साध्य करत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.

या अभियानाची सुरुवात समतेचे प्रतीक पंढरीच्या विठोबा दर्शनाने झाली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून साळवा-साकरे गटातील बांभोरी, भवरखेडे, बोरगाव, जांभोरा, सारवे, बाभळे, धानोरा, गारखेडा, भोणे, रोटवद, नांदेड, साळवा, निशाणे, पिंपळे या गावांचा दौरा करण्यात आला. यावेळी जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन पक्ष संघटनबांधणीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
माजी युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील यांनी सांगितले की, शरद पवार यांचे कृषी, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि युवकांबाबतचे निर्णय समाजहिताचे असून ते घराघरात पोहोचवणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांची माहिती घेऊन त्यावर पक्षाच्या माध्यमातून उपाययोजना राबवण्याचा मानसही यावेळी व्यक्त करण्यात आला. यानंतर पिंप्री-सोनवद आणि पाळधी-चांदसर गटातही हे अभियान राबवले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
अभियानात सहभागी झालेल्या गावांतील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. बांभोरीचे धर्मा आबा, भवरखेड्याचे संभाजी आबा, बोरगावचे अनिल पाटील, सारवेचे रघुनाथ पाटील, बाभळ्याचे वाल्मिक पाटील, गारखेड्याचे किशोर पाटील, धानोऱ्याचे गणेश महाजन, भोणेचे मकरध्वज पवार, रोटवदचे दीपक पाटील, साळवेचे राजाराम गुरुजी, निशाणेचे सुभाष पाटील, पिंपळेचे तुकाराम पाटील आदींसह असंख्य निष्ठावंतांनी अभियानात सहभाग घेतला.
यावेळी तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, माजी युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी सरपंच उज्वल पाटील, ओंकार माळी, राजू धनगर, सुरेश महाजन, लक्ष्मणराव पाटील आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने हजारो कार्यकर्त्यांना नेतृत्त्व दिले असून, आगामी काळात संघटन मजबूत करून नव्या नेतृत्त्वाची फळी उभी केली जाईल.
तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले की, साळवा-साकरे गटातील युवकांनी गावागावात शाखा सुरू करून गावकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक आणि विधायक पद्धतीने कार्य करावे. पक्षाच्या माध्यमातून युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्ता सज्ज असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



