
अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील ‘ढेकु’ शिवारात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालत एका शेतकऱ्याची पाच जनावरे चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील ढेकू बुद्रुक रहिवासी आणि शेतकरी महेंद्र सयाजीराव पाटील (वय ४३) यांची शेतजमीन गट नं. ९७ मध्ये आहे. त्यांनी आपली जनावरे शेतातील कंपाऊंडमध्ये सुरक्षितरीत्या बांधली होती. १ एप्रिल च्या मध्यरात्री १२ ते २ एप्रिलच्या पहाटे ५:३० वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश केला आणि पाच जनावरांची चोरी केल्याचे समोर आले. यात शेतकऱ्यांचे ८७ हजारांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ लक्ष्मीकांत शिंपी हे करीत आहे.



