जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यांवर अनाधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपाली मनोज काळे यांनी वाहतूक शाखेला धडक कारवाई करण्याचे निर्देश देत पत्र पाठविले आहे. शहरातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्यामुळे ही बाब गंभीर बनली असून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महापौर दीपाली काळे यांनी जळगाव शहर वाहतूक शाखेच्या निरीक्षकांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, जळगाव हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्याने विविध तालुके, उपनगर आणि ग्रामीण भागातील नागरिक शासकीय कामकाज, वैद्यकीय उपचार, बाजारपेठ तसेच शैक्षणिक कारणांसाठी मोठ्या संख्येने शहरात येत असतात. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते.

अशा परिस्थितीत काही अवजड वाहनधारक तसेच इतर वाहनधारक शहरातील प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यांवर अनधिकृतपणे वाहने पार्क करत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः अजिंठा चौफुली ते लड्डा फार्म हाऊसपर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी अवजड वाहने उभी केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर काही कारबाजार चालकांकडून विक्रीसाठी ठेवलेली जुनी वाहनेही रस्त्यांवर उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
भास्कर मार्केट परिसरातही जुनी वाहने विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेकडो वाहने रस्त्यांवर उभी करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. परिणामी रस्त्यांची रुंदी कमी होत असून वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या अनाधिकृत पार्किंगमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असून नागरिकांकडून महापौर कार्यालयाकडे वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रसार माध्यमांतूनही या समस्येबाबत नागरिकांचा रोष व्यक्त होत असल्याची नोंद घेण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर महापौरांनी वाहतूक शाखेला शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांवर अनधिकृतपणे वाहने उभी करणाऱ्या वाहनधारकांवर तसेच वाहन विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्याची विनंती केली आहे. भविष्यात अशा प्रकारे बेशिस्तपणे वाहने लावण्यावर कायमस्वरूपी निर्बंध घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचीही सूचना करण्यात आली आहे.



