सोलापूर लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या पनवेल येथील भाविकांवर काळाने भीषण घाला घातला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवडी पाटीजवळ शनिवारी १७ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास अर्टिगा कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील सहा मित्र एका अर्टिगा कारने (क्र. MH-46 Z 4536) अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाले होते. रात्रीच्या वेळी महामार्गावरून जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडावर जोरात जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, कार रस्त्यापासून १० ते १५ फूट दूर झुडपांमध्ये फेकली गेली.

पाच जणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर :
या अपघातात तीन पुरुष आणि दोन महिला अशा एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह कारमध्ये पूर्णतः अडकले होते. ज्योती जयदास टाकले (रा. सेक्टर ७, पनवेल) या महिला प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तत्काळ मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
पोलीस आणि नागरिकांची धाव :
अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मोहोळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कार कापून मृतदेह बाहेर काढले. अपघातग्रस्त कारचा चक्काचूर झाला असून, या घटनेमुळे पनवेल परिसरात आणि महामार्गावर मोठी शोककळा पसरली आहे. अतिवेगामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेसंदर्भात मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.



