जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण आणि ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, भोकणी गावासाठी महामार्गाला लागून सर्व्हिस रस्ता, बसस्थानक आणि तातडीने कटपॉईंट तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी बांभोरी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ९ डिसेंबर रोजी शिवकॉलनी येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन सादर केले.
धरणगाव तालुक्यातील भोकणी गावाजवळून हा राष्ट्रीय महामार्ग जात असला तरी, गावात ये-जा करण्यासाठी आवश्यक असलेला सुरक्षित कटपॉईंट आणि सर्व्हिस रस्त्याची सोय नसल्यामुळे ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. तसेच, बसस्थानकाची सोय नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते.

या सर्व समस्यांकडे महामार्ग प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बांभोरी ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन बिराडे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील शेतकरी यांनी एकत्र येऊन NHAI च्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात, महामार्ग प्रशासनाने भोकणी गावाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि या महत्त्वाच्या कामांचा समावेश महामार्ग विकासाच्या आराखड्यात करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. जर प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर भविष्यात ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.



