केऱ्हाळा गावाकडे ग्रामविकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; मनसेची बदलीची मागणी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील ग्राम विकास अधिकारी एस.टी. पाटील यांनी जनतेची कामे न केल्यामुळे विकास कामांना अडथळा निर्माण झाला आहे. अशा अधिकाऱ्यांना के-हाळा गावातून मुक्त करून दुसरा कर्तव्यदक्ष अधिकारी देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. तक्रारीची दखल न घेतल्यास येत्या २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला ग्रामस्थांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, के-हाळा ग्रामपंचायतीतील ग्राम विकास अधिकारी एस.टी. पाटील यांच्या विरोधात नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रारी केल्या आहेत, पण त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. ग्राम विकास अधिकारी श्री. पाटील हे के-हाळा मुख्यालयी न राहता रावेर शहरात खाजगी कामात व्यस्त असतात. यामुळे जनतेची कामे प्रलंबित राहतात. त्यांच्या या वर्तणुकीमुळे गावाकडे दुर्लक्ष होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांची गरज नसल्याचे सांगून त्यांची तात्काळ बदली करून गावाला त्यांच्यापासून मुक्त करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, २ ऑक्टोबर गांधी जयंतीला जन आंदोलन किंवा आमरण उपोषण करण्यात येईल, याची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा दिला आहे. निवेदनावर गावातील चेतन आढलकर यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत.

Protected Content