बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील नागरीकांना अनेक वर्षापासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही समस्या कायमची दुर करण्यासाठी आ.चंद्रकांत पाटील यांनी शासनाकडे पाठपूरावा करून या पाणी पुरवठा योजनेला गती मिळाली आहे.
यासंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी आ. चंद्रकांत पाटील, नाशिकचे मुख्य अभियंता भुजबळ , अधीक्षक अभियंता श्रीमती नरवाडे, मुख्याधिकारी गजानन तायडे, शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सईद बागवान तसेच संबंधित अधिकारी यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.

भविष्यातील २५ ते ३० वर्ष लक्षात घेता ही योजना त्या स्वरूपात तयार व्हावी व मंजूरी मिळावी म्हणून नियोजित प्रस्तावित योजनेत ज्या काही त्रुटी व तांत्रिक अडचणी होत्या. या संदर्भात सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदारांनी केल्या तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आचार संहिता काळामध्ये त्रुटी व अडचणी तसेच कागदपत्रांची पूर्तता करून योजनेला गती मिळावी अशी अपेक्षा व्यक्ती करून संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले.
त्यामुळे योजनेला तातडीने वेग मिळून आचारसंहिता संपताच सदरील योजनेला मंजुरी मिळणार असून लगेचच निविदा प्रक्रिया राबवून कामात सुरुवात होणार असल्याने आता बोदवड करांची गेल्या अनेक वर्षापासूनची तहान आता भागणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे.
मंत्र्यांच्या निवास स्थानी झालेल्या चर्चेनंतर मुक्ताईनगर येथे बोदवड शहराच्या स्वतंत्र पाणीपुरवठ्याचा स्रोत तपासण्यासाठी संबंधित अधिकारी यांना सोबत घेवून आमदारांनी स्थळ निरीक्षण केले. बोदवड पाणीपुरवठा योजनेचा श्रोत हा तापी नदीच्याचं पात्रातून घेण्यासंदर्भात अधिकारी वर्ग यांना पाहणी करून त्यासंदर्भातील अहवाल शासन दरबारी लवकरात लवकर सादर करावा अशी सूचना केली. ‘तसेच आमदारांनी सद्य स्थितीत मुक्ताईनगर व बोदवड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व नियमित व्हावा संदर्भात देखील चर्चा करून मुख्याधिकारी गजानन तायडे यांना सूचित केले आहे.



