यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या यावल तालुक्यातील मोर धरण भरून वाहू लागले असून, धरणात ८५ टक्के जलसाठा झाल्याने प्रशासनाने दोन दरवाजे उघडून १५०.९६ क्युसेस पाणी मोर नदीच्या पात्रात सोडले आहे. यामुळे यावल तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, कारण या वर्षी पहिल्यांदाच मोर नदीतून पाणी सोडण्यात आले आहे.

मोर धरण हे हिंगोणा-मरूळ परिसरात वसलेले असून, त्याचा उपयोग आसपासच्या अनेक गावांच्या शेतीसाठी होतो. मागील काही दिवसांपासून सातपुडा परिसरात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे आज दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी प्रशासनाने नियोजित निर्णय घेऊन धरणाचे दोन दरवाजे उघडले आणि पाणी नदीपात्रात सोडले.

सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मोर नदीमध्ये पुन्हा एकदा जीवन संचार झाला असून, विशेषतः मारूळ, न्हावी, आमोदा, वनोली, कोसगाव, पाडळसा या गावांतील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. जर हे पाणी कोसगावपर्यंत पोहोचले, तर संबंधित गावांतील भूगर्भ जलपातळी वाढून विहिरींना आणि पाणवठ्यांना आधार मिळेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.
या पावसाळ्यात सातपुड्यात आणखी आठ-दहा दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याने नदीला संभाव्य पूर येऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदी पात्रात उतरणे टाळावे आणि जीवित वा पशुधनाची हानी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या जलप्रवाहामुळे यावल तालुक्यातील शेतशिवाराला नवी उमेद मिळाली असून, शेतकरी वर्गाला खरीप हंगामासाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



