जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बसस्थानक आवारात आलेल्या वृध्द शेतकऱ्याच्या खिश्यातून ३५ हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी ७ ऑगस्ट रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शालीग्राम तुकाराम पाटील वय ६५ रा.सामरोद ता.जामनेर हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. बुधवारी ७ ऑगस्ट रोजी ते कामाच्या निमित्ताने जळगाव शहरात आले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास ते जामनेरला जाण्यासाठी जळगाव बसस्थानकात आलेले होते.
जामनेर बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिश्यातील ३५ हजारांची रोकड काढून चोरून नेले. पैशांची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद भोळे हे करीत आहे.