जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात बौद्ध समाजासाठी प्रथमच भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमामुळे गोरगरिब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. दक्षा फाउंडेशन जळगाव आणि बौद्ध वधू-वर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात असून, विवाहासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या वधू-वरांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.
या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधू-वरांना महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत ३० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय नवदांपत्यांना गृहउपयोगी वस्तूही मोफत प्रदान करण्यात येणार आहेत. त्यामुळे विवाहाचा वाढता खर्च परवडत नसलेल्या कुटुंबांसाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

दक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष उत्तमराव सपकाळे यांनी वधू-वरांना आवाहन करत सांगितले की, इच्छुकांनी १४ एप्रिल २०२६ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह आपली नोंदणी करावी. नोंदणीसाठी दु. नं. २१, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, जिल्हा पेठ, जळगाव येथे संपर्क साधता येणार आहे. वधू-वर सूचक मेळावा आणि सामूहिक विवाह सोहळा यासाठी ही नोंदणी अनिवार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हा विवाह सोहळा पूर्णपणे मोफत स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून, जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू बौद्ध समाजातील वधू-वरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे विवाह लांबणीवर टाकणाऱ्या कुटुंबांसाठी हा उपक्रम एक नवी दिशा देणारा ठरणार आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष आशिष सपकाळे तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि वधू-वर सूचक संस्थेचे संस्थापक युवराज वाघ यांनीही या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. समाजातील वंचित घटकांना सन्मानाने विवाह करता यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.



