Home Cities जळगाव अर्थसंकल्प २०२६-२७ हा महाराष्ट्रासाठी सुवर्णसंधी : ना. रक्षा खडसे

अर्थसंकल्प २०२६-२७ हा महाराष्ट्रासाठी सुवर्णसंधी : ना. रक्षा खडसे


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा भारताला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक निर्णायक आणि ऐतिहासिक पाऊल असल्याचे मत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी व्यक्त केले आहे. युवक, महिला, शेतकरी आणि गरीब या चार प्रमुख स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा असून, राज्याला ‘आर्थिक महासत्ता’ बनवण्याच्या दृष्टीने तो मैलाचा दगड ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विक्रमी निधीची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे क्षेत्रासाठी १५,९४० कोटी रुपयांची तरतूद असून, ही रक्कम २००९ ते २०१४ या कालावधीतील सरासरीपेक्षा तब्बल १३ पट अधिक आहे. ‘अमृत भारत स्थानक’ योजनेअंतर्गत राज्यातील १३२ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार असून, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे यांसारख्या प्रमुख स्थानकांचा त्यात समावेश आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी ५२,००० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, २३८ नवीन स्वयंचलित दरवाजांच्या वातानुकूलित लोकल गाड्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

दळणवळण आणि हवाई क्षेत्रालाही या अर्थसंकल्पातून नवी झळाळी मिळणार आहे. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरणासाठी ७,००० कोटी रुपये, तर शिर्डी विमानतळावर ६४५ कोटी रुपयांचे एकात्मिक टर्मिनल उभारले जाणार आहे. ‘कृषी उडान’ योजनेत नाशिक आणि पुणे विमानतळांचा समावेश झाल्याने उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपला कृषीमाल थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मुंबई-पुणे प्रवास ४८ मिनिटांत आणि पुणे-हैदराबाद प्रवास अवघ्या २ तासांत पूर्ण करण्याचे हाय-स्पीड रेल्वेचे उद्दिष्ट राज्याच्या विकासाला नवे परिमाण देणारे ठरेल.

युवा शक्ती आणि क्रीडा क्षेत्र या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी आहेत. ‘पीएम इंटर्नशिप स्कीम’साठी ४,७८८ कोटी आणि ‘स्किल इंडिया’साठी २,८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यामुळे लाखो तरुणांना प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. १५,००० शाळांमध्ये ‘कंटेंट क्रिएटर लॅब’ उभारल्या जाणार असून, १०,००० मार्गदर्शकांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. क्रीडा साहित्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन रोजगारनिर्मितीवर भर देण्यात आल्याने भारत क्रीडा उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर पुढे जाण्याची शक्यता आहे.

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरही या अर्थसंकल्पात ठळक भर देण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रातील स्टार्ट-अप्स आणि एमएसएमईंसाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्याने पुण्यासारख्या तंत्रज्ञान केंद्रांसह ग्रामीण भागातील लघुउद्योगांना मोठा लाभ होणार आहे. ‘सेमीकंडक्टर मिशन २.०’ अंतर्गत ४०,००० कोटी आणि भारताला ‘ग्लोबल बायो-फार्मा हब’ बनवण्यासाठी १०,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यामुळे महाराष्ट्रातील आयटी हब आणि नवउद्योजकांसाठी रोजगाराच्या अमर्याद संधी उपलब्ध होतील.

कृषी क्षेत्रासाठी १,६२,६७१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, जळगाव जिल्ह्यातील कापूस आणि केळी पिकांच्या प्रक्रियेसाठी नवीन एग्रो-क्लस्टर्स जाहीर करण्यात आले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी विशेष शासकीय वसतिगृह उभारले जाणार असून, ग्रामीण भागात ‘SHE Marts’ सुरू केल्या जातील. औद्योगिक विकासासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरला पालघर येथील वाढवण बंदराशी जोडण्यात येणार असून, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या शहरांचा ‘सिटी इकॉनॉमिक रिजन’ म्हणून विकास करण्यासाठी प्रत्येकी ५,००० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या मानवतावादी निर्णयांमध्ये मोटार अपघात दावा न्यायाधिकरणामार्फत मिळणाऱ्या भरपाईच्या व्याजावर १ एप्रिल २०२६ पासून टीडीएस न कापण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरतो. यामुळे अपघातग्रस्त कुटुंबांना थेट आर्थिक आधार मिळणार आहे. “महाराष्ट्राचा तरुण हाच विकसित भारताचा खरा कणा आहे आणि त्याला संधी देण्यासाठी आमचे मंत्रालय पूर्ण ताकदीने कार्यरत राहील,” असा विश्वास श्रीमती रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.

एकूणच केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा केवळ आकड्यांचा ताळेबंद नसून, महाराष्ट्राच्या आकांक्षांना पंख देणारा सर्वसमावेशक विकास आराखडा आहे. पायाभूत सुविधा, युवकांसाठी रोजगार, शेतकऱ्यांची समृद्धी आणि तांत्रिक नवोन्मेष यांचा समतोल साधत हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला देशाच्या प्रगतीचे ‘इंजिन’ बनवण्याच्या दिशेने नेणारा ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला हा अर्थसंकल्प ‘विकसित महाराष्ट्र, विकसित भारत’ हे ध्येय गाठण्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचा ठाम विश्वास श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound