Home Cities जळगाव आकाशवाणी चौक व इच्छा देवी सर्कलची स्वच्छता न झाल्यास मनसेचा “सर्कलमध्ये बकऱ्या चारण्या’चा...

आकाशवाणी चौक व इच्छा देवी सर्कलची स्वच्छता न झाल्यास मनसेचा “सर्कलमध्ये बकऱ्या चारण्या’चा इशारा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रमुख आकाशवाणी चौक आणि अजिंठा चौफुलीतील इच्छा देवी सर्कल परिसरात वाढलेल्या गवतझुडपांमुळे परिसर विद्रूप झाला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या अस्वच्छतेबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) तातडीने साफसफाईची मागणी करणारे निवेदन दिले आहे. “तीन दिवसांत सर्कल परिसर स्वच्छ न केल्यास मनसे कार्यकर्ते त्या ठिकाणी बकऱ्या चारतील,” असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

मनसेच्या निवेदनात नमूद केले आहे की, “आकाशवाणी चौक हा जळगाव शहरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा भाग आहे. या मार्गावरून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. अशा ठिकाणी वाढलेली झुडपे, गवत आणि कचऱ्याचे ढिगारे हे शहराच्या सौंदर्यावर डाग ठरत आहेत.”

मनसेने स्पष्ट चेतावणी दिली आहे की, जर संबंधित विभागाने तीन दिवसांत या ठिकाणी स्वच्छतेची कामे केली नाहीत, तर प्रतीकात्मक निषेध म्हणून मनसे कार्यकर्ते त्या सर्कलमध्ये बकऱ्या चारतील. या इशाऱ्यामुळे शहरात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सदर महामार्ग शहराच्या बाहेरून गेलेला असल्याने संबंधित सर्कल परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेची आहे. या संदर्भात सविस्तर पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यात येणार आहे.”

या निवेदनावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद, ॲड. सागर शिंपी, विकास पाथरे आणि विभाग अध्यक्ष दीपक राठोड हे उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound