भुसावळ, प्रतिनिधी । देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉक डाउनचा फटका आता हळूहळू केळीच्या हरितपट्ट्यात सुद्धा जाणवू लागला आहे. यावल-रावेर तालुक्यात लाखों रुपये खर्चून लावलेल्या केळी शेतकऱ्याला संचारबंदीमुळे स्वतः कवडीमोल भावाने विकावी लागत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहावयास मिळत आहे.
यावल-रावेर तालुक्यातील हजारो केळी उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या केळीला योग्य भाव मिळत नसल्याने तसेच लॉक कडाऊनमुळे व व्यापारी वर्ग केळीला अत्यंत कवडीमोल भावाने मागत असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. केळी ही कापणीवर आल्याने व हा एक नाशवंत पीक असल्याने शेतकरी स्वतः गावोगावी फिरुन हा माल अगदी दोन ते पाच रु किलो अशा कवडीमोल भावाने विकून थोडाफार उत्पादन खर्च तरी निघू शकेल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तरी शासनाने अशा केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटाकडे गांभीर्याने लक्ष देऊन मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.