मोदींचा मेंदू महाराष्ट्रात ; प्रकाश आंबेडकरांच्या टीकेचा रोख शरद पवारांकडे ?

पुणे: : वृत्तसंस्था । मोदींचा मेंदू महाराष्ट्रात , असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

दिल्लीतील शेतकरी आंदोलन वस्तुस्थितीला धरून आहे. मला शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला दिल्लीत का जात नाही म्हणून विचारलं जातं. पण माझा लढा राज्यात आहे. राज्यात लढा पूर्ण होत नाही तोपर्यंत दिल्लीत जाणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अख्खा मेंदू राज्यात आहे, अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांचं नाव न घेता केली आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी ही टीका केली आहे. राज्यात काँन्ट्रॅक्ट फार्मिंग कायदा करण्यापासून आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला थांबवू शकलो नाहीत. कृषी हा राज्याचा विषय आहे. राज्यातील कायदा रद्द झाला तर देशातील कायदा आपोआप रद्द होतो. कायदा राज्यावर अवलंबून आगहे. तीन पायाच्या सरकारला हा कायदा रद्द करण्यात काय अडचण येत आहे? असा सवाल करतानाच जमिनी वाचवायच्या असतील तर काँन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा रद्द केला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि शेती मालकांचा संबंध काय? हे एकदा केंद्राने जाहीर केलं पाहिजे, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं.

कृषी कायद्यावरून कोर्टात जाण्याचा विषयच शिल्लक राहत नाही. हा राज्य आणि केंद्राचा विषय असून त्यांनी त्यावर निर्णय घ्यायला हवा. या कायद्यामुळे पुन्हा सावकारकी सुरू होईल. शेतकऱ्यांच्या जमिनी जातील. एकदा हे झालं तर शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहमार नाही. बाजार समिती ही यशवंतराव चव्हाणांची संकल्पना होती. कसेल त्याची जमीन याचा कायदा करण्यात आला होता. पण उत्पादनाची लूट थांबवण्यासाठी काहीच करण्यात आलं नाही, असं सांगतानाच आता तर कायद्यात दुरुस्ती करण्याचं सोडा, बाजार समित्याच रद्द करण्याचा घाट घातला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

यावेळी आंबेडकर यांनी एल्गार परिषदेबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली. एल्गार परिषदेतील भाषण समोर आलेलं नाही. या एल्गार परिषदेला मी महत्त्व देत नाही. अगोदरच्या एल्गार परिषदेचा हेतू वेगळा होता. समाजात एकोपा निर्माण होण्यासाठी एल्गार परिषदेची स्थापना करमअयात आली होती. मी अध्यक्ष असताना एल्गार परिषद बरखास्त करण्यात आली होती. उरलेल्या एल्गार परिषदेशी आमचा संबंध उरलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मी कॉलेजमध्ये शिकत असताना आरक्षणाचा मुद्दा कधीच चर्चिला गेला नव्हता. कोण कुठं शिक्षणाला जाणार याची सोय करण्यात आली होती. तेव्हा आरक्षणावरून भांडणं झाली नाही. मग आज भांडणे का होत आहेत? लोकसंख्या वाढली तशी विद्यार्थ्यांची संख्याही वाढली. पण दुर्देवाने राज्यकर्त्यांनी त्यानुसार नियोजन केलं नाही. शासनकर्ते आले आणि गेले. पण त्यांनी सामाजिक व्यवस्थेत होणाऱ्या बदलांना महत्त्वं दिलं नाही. त्यामुळेच बिघडलेल्या मानसिकतेला, आजच्या वातावरणाला बदलण्याची गरज आहे. वसंतदादा पाटील यांच्यानंतर एकही राजकारणी सोशल कॉन्शन्स झाला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Protected Content