मुंबई (वृत्तसंस्था) विद्यमान खासदार राजेंद्र गावित शिवसेनेच्या तिकीटावर पालघरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राजेंद्र गावित यांनी आज ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दुसरीकडे लोकसभेच्या तिकीटासाठी इच्छुक असलेले श्रीनिवास वनगा यांची बोळवण झाल्याचे दिसतेय.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “श्रीनिवासला संसदेत पाठवायचं आहे हा शब्द मला लक्षात आहे. श्रीनिवासला विधीमंडळात कसं पाठवायचे ते मी बघेन, तो माझा शब्द आहे. त्यानंतर मी त्याला लोकसभेसाठी पाठवेन. युती झाली आहे, गावित चांगले काम करत आहेत. युती अधिक घट्ट होईल. तर मी स्वत: निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार बनून भविष्यात काम करण्याचा विचार आहे, असे श्रीनिवास वनगा यांनी सांगितले. पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे श्रीनिवास वनगा आणि भाजपच्या राजेंद्र गावित यांच्यात प्रमुख लढत झाली होती. यात राजेंद्र गावित यांचा विजय झाला होता. मात्र शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर पालघरची जागा शिवसेनेच्या खात्यात आली. त्यामुळे या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची यावरुन खल सुरु होते. अखेर राजेंद्र गावितांना शिवसेनेकडून तिकीट देण्याचा निर्णय झाला. वनगांना विधीमंडळात पाठवणार असल्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याचे कळते.