Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा परिषदेचा कार्यकाळ उद्या संपणार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । – जिल्हा परिषदेचा २०१७-२०२२ पंचवार्षिक कालावधी २० मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष, विविध विषय समित्यांचे सभापतींना देण्यात आलेली शासकीय वाहने रविवार २० पूर्वी शासकीय कार्यालयात जमा करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले आहेत.

जळगाव जिल्हा परिषदेतील विद्यमान अध्यक्ष विविध विषय सभापती सदस्यांचा सन २०१७ ते २०२२ चा पंचवार्षिक कालावधी २० मार्च रोजी संपुष्टात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सन २०११ च्या जनगणनेनुसार गेल्या १० वर्षातील लोकसंख्या वाढीनुसार तसेच काही ठिकाणी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषद पंचायतीत झाल्याने गण आणि गटांची विभागणी झाली आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या आगामी निवडणुकीसाठी गट आणि गण रचनेत प्रारूप आराखडा सादर करण्याचे निर्देश फेब्रुवारीतच देण्यात आल्यानुसार प्रारूप आराखडा सादर झाला होता. परंतु राज्य शासनाने ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढून त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी देखील झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समित्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका डिसेंबर पर्यंत लांबणीवर असल्याने जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष, विषय समिती सभापती, सरपंच समिती सभापती यांचा कार्यकाळ २० मार्च रोजी संपणार असल्याने त्यांना देण्यात आलेली शासकीय वाहने कार्यकाळ संपण्यापूर्वी रविवारपर्यंत प्रशासनाच्या ताब्यात घेण्याचे निर्देश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिया यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.

Exit mobile version