Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर ‘त्या’ दोन बेपत्ता भावंडांच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल

FIR

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील चुंचाळे शिवारातून काल दुपारी बेपत्ता झालेली दोन भावंडे रात्री उशीरापर्यंत शोध घेऊन देखील न आढळून आल्याने या बाबत यावल पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तालुक्यातील चुंचाळे येथील गायरान परिसरात रवींद्र सावळे आणि उज्ज्वला सावळे हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्यांना रितेश आणि हितेश ही अनुक्रमे ५ आणि ६ वर्षांची मुले आहेत. बुधवारी आपल्या आई-वडिलांच्या सोबत ही दोन्ही मुले शेतात गेली होती. सावळे दाम्पत्य शेतात काम करत असतांना ही दोन्ही मुले खेळत असल्याने कुणी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. मात्र दुपारी दोनपासून ती मुले दिसून न आल्याने त्यांचा परिसरात शोध घेण्यात आला.चुंचाळे शिवारासह नायगाव, सौखेडासीम आदींसह पंचक्रोशीत त्यांचा दुपारपासून शोध घेण्यात येत असला तरी ते मिळून न आल्याने सावळे दाम्पत्य धास्तावले आहे.

या संदर्भात रात्री उशीरा पर्यंत मुलांचा शोध लागला नव्हता. यामुळे दोन्ही बालकांचे वडील रवींद्र मधुकर सावळे ( वय ३५, रा. चुंचाळे, ता. यावल) यांनी फिर्याद दिली. यात हितेश रवींद्र सावळे (वय ६) आणि रितेश रवींद्र सावळे (वय ५) या दोन्ही भावंडांना कुणी तरी फुस लाऊन अथवा अन्य कारणाने पळवून नेल्याप्रकरणी भाग ५ गुरनं १८७/२०२१ भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरिक्षक विजय पाचपोळे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

Exit mobile version