Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरात पाणी पुरवठा ठप्प : नगरपंचायतीसह महावितरणवर रोष

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे कडक उन्हाळ्याने लोक हैराण झालेले असतांनाच नगरपंचायतीसह महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगर शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर मोठा जलसाठा असतांना देखील शहरात पाणी टंचाई सातत्याने जाणवत असते. सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे आधीच पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. यातच महावितरणच्या भोंगळ कारभाराची भर पडल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाणीच येत नसल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्या सुमारे पाच दिवसांपासून महावितरणची वीज ये-जा करत असल्याने पाणी पुरवठा अक्षरश: ठप्प झाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात संतप्त झाले आहे. मुक्ताईनगर नगरपंचायत आणि महावितरणने याची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा शहरातील नागरिकांच्या संतापाचा स्फोट होऊ शकतो अशी स्थिती आता उदभवली आहे.

Exit mobile version