Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओव्हर फ्लो होणार वाघूर धरण; नदीकाठच्या गावांना इशारा

जळगाव प्रतिनिधी | वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरण आता भरण्याच्या मार्गावर असून यातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. यामुळे खालील बाजूला नदीकाठी असणार्‍या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वाघूर धरणाची जलपातळी आज दुपारी तीन वाजता 233.79 मीटर झाली आहे. वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. येत्या 24 तासांत वाघूर धरणातील जलसाठा पूर्ण होण्याची शक्यता असल्याने धरणातून वाघूर नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्याची कार्यवाही होवू शकते. त्यामुळे वाघूर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असा इशारा कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिला आहे.

नदीपात्रामध्ये गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.

 

Exit mobile version